नगर:(राजेंद्र त्रिमुखे)
अखेर विधानसभा निवडणुकीचा बिगुल एकदाचा वाजला असून आता येणाऱ्या काळात राजकीय घडामोडींना मोठा वेग येणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीतून कोणाला कोणत्या मतदारसंघात जागा सुटणार आणि या ठिकाणी कोण उमेदवार असणार याची मोठी उत्सुकता आणि चर्चा आता दिसून येणार आहे.
हॅट्रिकचा संग्राम.. आणि मंत्रिपदाची संधी!!
नगर शहर मतदारसंघाचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांची उमेदवारी घोषित होणे केवळ औपचारिकता आहे. पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार हे विद्यमान आमदारांचे उमेदवारी आज घोषित करतील अशी माहिती आहे. या निमित्ताने संग्राम जगताप यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळवून आमदारकीची हॅट्रिक साधनेची मोठी संधी आहे. ही संधी संग्राम जगताप यांनी साधली आणि राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आले तर सिनेरीटीच्या मुद्यावर त्यांना मंत्रिमंडळातही संधी असणार आहे.
शिंदे शिवसेनेत शांतता तर भाजपात चुळबुळ!!
महायुतीमध्ये शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा मोठा बोलबाला आहे आणि याला कारण म्हणजे आमदार संग्राम जगताप यांनी संपूर्ण शहर मतदारसंघात तयार केलेले युवा कार्यकर्त्यांचे जाळे आहे. प्रत्येक प्रभागात संग्राम जगताप यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा मोठा संच असून संग्राम जगताप यांच्या हाकेला धावून जाणारा कार्यकर्त्यांच्या बळावर सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढवताना ही निवडणूक त्यांना सोपी मानली जात आहे. महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाचा प्राबल्य अगदी मोजक आहे. महायुतीमध्ये एकीकडे भाजपामध्ये उमेदवारीसाठी चुळबुळ सुरू असताना शिवसेना शिंदे गटात मात्र संपूर्ण शांतता दिसून येत आहे. भारतीय जनता पक्ष मात्र नगर शहराची जागा मिळावी यासाठी अंतर्गत प्रयत्नशील आहे. शहरातील भाजपाचे नेते वसंत लोढा, अभय आगरकर आदींनी शहरातील जागेवर जाहीरपणे दावा बोलून दाखवला असून पक्षश्रेष्ठींकडे तशी मागणी केल्याचं सांगितलेलं आहे. मात्र भाजपाची ही मागणी आणि त्यासाठीच वादळ हे केवळ पेल्यातील वादळ असणार अशी एकंदरीत परिस्थिती आहे. आगरकर,लोढा यांची उमेदवारी मागताना आक्रमकता असली तरीही पक्षश्रेष्ठींच्या आदेशाला मानणारे आम्ही कार्यकर्ते असल्याचेही या नेत्यांनी सांगितले आहे.
भाजप साठी शहरात आमदारकी एक स्वप्नच!!
वास्तविक भारतीय जनता पक्षाचे शहरांमध्ये चांगले अस्तित्व असले तरीही विधानसभा निवडणुकीसाठी भाजप जवळपास 40 वर्ष वाट पाहून ताटकळत बसलेला आहे. पूर्वी युती आणि आता महायुतीचा धर्म पाळत बसल्याने नगर शहरात भाजपचा आमदार हे कार्यकर्त्यांसाठी एक स्वप्नच होऊन बसले आहे. याबाबतची उलघाल निश्चितच भाजप नेते आणि कार्यकर्त्यात असली तरीही लोकसभेचे निकाल पाहता यंदाची विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी सोबत अटीतटीची लढत असल्याने पक्षश्रेष्ठी कोणतीही जोखीम न घेता नगर शहराची जागा राष्ट्रवादी अजित पवार पक्षालाच अर्थात संग्राम जगताप यांनाच मिळणार हे त्रिवार सत्य म्हणावे लागेल. मात्र भाजपला जागा न करता सुटल्याने शहरातील भाजप प्रचारात किती सक्रिय राहणार या बद्दल शंका असणार आहे. सुजय विखे यांना शहरात मिळालेला लीड शहर भाजप मुळे असल्याचा दावा अभय आगरकर यांनी केला आहे. मात्र उमेदवारीची अर्थात आमदारकीची स्वप्ने पाहणारे शहर भाजपातील नेते भाजपला जागा न सुटल्यास किती तनमनाने काम करणार महत्वाचा विषय आहे. वसंत लोढा यांनी तर भाजपला जागा न सुटल्यास मला इतर मतदारसंघातील जबाबदारी द्या असे जाहीर सांगितले आहे यातच बरेच काही आहे. असे असले तरी भाजपातील अनेक माजी नगरसेवक “भैय्यांच्या” शब्दाला खाली पडू देत नाहीत अशीही परस्थिती आहेच!!
उमेदवारीचा सावळा गोंधळात खा.लंकेचा आशीर्वाद महत्वाचा!!
दुसरीकडे विरोधी गटातील महाविकास आघाडी उमेदवारीवरून एकूणच सावळा गोंधळ दिसून येत आहे. निवडणूक घोषित झालेली असली तरी अद्यापही संग्राम जगताप यांच्यासमोर कोण आव्हान देण्यास उभे राहणार याची स्पष्टता नाही आणि ही स्पष्टता अजून पुढील काही दिवस अशीच कायम राहील असेच दिसून येत आहे. महाविकास आघाडीतील तीनही पक्षातील इच्छुक उमेदवारांनी तयारी केली असली तरी उमेदवारी बाबतच्या निर्णयात खा.निलेश लंके यांना मोठे महत्व असणार आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस या तीनही पक्षातील अनेक दावेदार उमेदवारीचे बाशिंग गुडघ्याला बांधून उभे असले तरी यातील उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार याची यापैकी एकालाही शाश्वती नाही. शरद पवार हे राज्याचे धूर्त राजकारण खेळणारे नेते मानले जातात आणि त्यामुळे नगर शहरासारख्या ठिकाणी उमेदवार देताना जिंकायचं असेल तर वेगळा काहीतरी निर्णय घ्यावा लागेल असेच दिसून येत असल्याने महाविकास आघाडी कडून असणाऱ्या उमेदवाराचं नाव हे धक्कादायक!! असेल. त्यातून महाविकास आघाडीतील इच्छुकांत काहीशी नाराजी दिसून येईल मात्र त्यावर मात करून संग्राम जगताप यांच्यासमोर आव्हान उभे राहील असाच उमेदवार देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांचा असेल आणि यामध्ये शरद पवार यांची महत्त्वाची भूमिका असेल अशी एकंदरीत परिस्थिती आहे.
कोतकरांच्या मेळाव्याने नगरी राजकारणात हल्लकल्लोळ!!
महाविकास आघाडी कडून संभाव्य उमेदवारी प्राध्यापक शशिकांत गाडे, भगवान फुलसौंदर, किरण काळे, अभिषेक कळमकर, बाळासाहेब बोराटे, राठोड कुटुंबातील एखादी व्यक्ती अशी अनेक नावे चर्चेत आहेत. मात्र या नावाव्यतिरिक्त सध्या संदीप कोतकर समर्थकांनी घेतलेला मेळावा आणि आक्रमक भूमिका पाहता महाविकास आघाडीतील उमेदवाराचे नाव कोतकर कुटुंबा भोवती फिरत असल्याचं दिसून येत आहे. नुकताच कोतकर समर्थकांनी एक मेळावा घेतला. या मेळाव्यात नगर शहरातून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच असा निर्णय झाल्याचे समजते. कोतकरांना मविआतुन उमेदवारी मिळणार का आणि कोणत्या पक्षाकडून यावर मोठी चर्चा सध्या शहरात सुरू आहे. मात्र याबाबत महाविकास आघाडीतील स्थानिक सर्व नेत्यांमध्ये मोठी चलबिचल असून याबाबतची भूमिका पक्ष नेतृत्वाकडे एकत्रितपणे अनेकांनी लेखी पत्र पाठवून मांडली आहे. याबाबत जाहीरपणे कोणताही नेता बोलत नसला तरीही खाजगीत कोतकर नको बाकी इतर कोणीही चालेल या भूमिकेपर्यंत महाविकास आघाडीतील स्थानिक नेते आलेले असले तरी संग्राम जगताप यांना तोडीस तोड आव्हान देण्याची ताकद यातील किती उमेदवारात आहे याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. आणि त्यामुळेच महाविकास आघाडीतील सावळ्या गोंधळावर उतारा म्हणून केडगावकरांना संधी मिळणार का याचीही मोठी उत्सुकता आहे.
जगतापांची प्रचारात आघाडी..
आ.संग्राम जगताप यांनी आपल्याला मिळालेल्या दीडशे कोटीच्या निधीमधून शहर आणि उपनगरातील अनेक रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ धुमधडाक्यात करत मोठमोठाले फ्लेक्स लावत प्रचाराला सुरुवात केलेली असताना महाविकास आघाडीत मात्र उमेदवारीची चाचपणी चाचपडत सुरू असल्याचं एकंदरीत चित्र आहे. त्यामुळे सध्या तरी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आ.संग्राम जगताप हे आघाडीवर असल्याचं म्हणावं लागेल.