विधानसभेसाठी नगर शहराची जागा भाजपला सोडा..अभय आगरकरांची आग्रही मागणी..
अहिल्यानगर:
युतीच्या काळामध्ये शिवसेनेच्या (स्व.)अनिल राठोड यांच्यामुळे तब्बल तीस वर्ष तर आता महायुतीमुळे दहा वर्ष भाजप कार्यकर्त्याला नगर शहरातून विधानसभा निवडणुकीसाठी संधी मिळालेली नाही. हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय असून आता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यात मोठी अस्वस्थता निर्माण झाली असल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी नगर शहराची जागा महायुती मधून भारतीय जनता पक्षाला मिळावी अशी आग्रही मागणी पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाकडे केली असल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते अभय आगरकर यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
युती-महायुती धर्म पाळण्यात आमच्या दोन पिढ्या वाया गेल्या..
-याबाबत आगरकर म्हणाले की भारतीय जनता पक्षाच्या जवळपास दोन पिढ्या केवळ पूर्वी युती आणि आता महायुतीचा धर्म पाळण्यात धन्यता मानत आल्या आहेत. मात्र यामुळे भारतीय जनता पक्षाच्या तळमळीच्या कार्यकर्त्याला आतापर्यंत विधानसभा निवडणुकीसाठी संधी मिळालेली नाही. युती असताना ही जागा अनिल राठोड यांच्या निमित्ताने शिवसेनेला दिली गेली, यात तीस वर्षे गेले आणि आता महायुती असल्याने विद्यमान आमदार हे मित्र पक्षाचे असल्याने महायुतीचा धर्म म्हणून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला काम करावे लागत आहे.
भाजप कार्यकर्त्यांत मोठी अस्वस्थता!!
-भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाचा आदेश मानणारे आहेत. मात्र कार्यकर्त्यांमध्ये आता विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून मोठी अस्वस्थता आहे. त्यामुळे आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच राज्याचे आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे आग्रहीपणे नगर शहराची जागा भारतीय जनता पक्षाला मिळावी अशी मागणी करणार आहोत असे आगरकर यांनी स्पष्टपणे सांगितले.
भाजपला नगर शहरात मोठा जनाधार..
-त्याचबरोबर आगरकर यांनी भारतीय जनता पक्षाला नगर शहरात जनतेचा मोठा पाठिंबा आतापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकातून तसेच महानगरपालिका निवडणुकांतून दिसून आलेला आहे. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला नेहमीच मोठी आघाडी नगर शहराने दिली असल्याने नगर शहरांमध्ये भारतीय जनता पक्षाचा आमदार व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. भारतीय जनता पक्षाला शहरात मोठा जनाधार आहे हे पक्ष वरिष्ठ नेतृत्वाला माहीत आहे. मात्र महायुती धर्म म्हणून आता किती दिवस उमेदवारीसाठी वाट पाहायची असा प्रश्न कार्यकर्त्यात दिसून येत आहे आणि म्हणून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुती मधून नगर शहराची जागा भारतीय जनता पक्षाला मिळावी अशी मागणी करणार असल्याचे अभय आगरकर यांनी सांगितले आहे.
वरिष्ठांच्या आदेशनानंतरच शहरातील कार्यकर्ते लागणार कामाला!!
-महायुती मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे(अजित पवार गट)विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनाच उमेदवारी दिली गेल्यास भाजप नेते म्हणून आपली काय भूमिका राहील? या प्रश्नांवर अभय आगरकर यांनी आम्ही आमच्या पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाशी नगरची जागा भाजपलाच मिळावी यासाठी आग्रह धरणार आहोत. त्यानंतर वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होतो आणि आमचे पक्षाचे वरिष्ठ आम्हांला जो पर्यंत निर्णय अथवा सूचना करणार नाहीत तो पर्यंत आम्ही आमचीही भूमिका स्पष्ट करणार नाही, असे स्पष्टीकरण आगरकर यांनी दिले आहे. त्यांच्या स्पष्टीकरणातून सध्या तरी भाजप नेते आणि कार्यकर्ते अलिप्त भूमिकेत असल्याचेच सूचित यावरून दिसून येत आहे. शहरात एकीकडे आ. संग्राम जगताप यांचे शेकडो फ्लेक्स झळकले असून त्यात महायुती म्हणून भाजप वा शिंदे शिवसेने बाबत कुणालाही स्थान नसल्याचे दिसून येत आहे. महायुती म्हणून तीनही पक्षात समनव्याबाबत यानिमित्तानही प्रश्नचिन्ह उभे असल्याचा परिणाम म्हणून भाजप मधून नाराजीचा सूर वाढल्याचे बोलले जात आहे.