नगर:
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या राहाता तालुक्यातील श्री गणेश साखर कारखाना निवडणुकी पासून नगर जिल्ह्यात नवी राजकीय समिकरणांची नांदी सुरू झाली असून त्याचे प्रत्येनंतर नुकत्याच झालेल्या जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात आणि सध्या सुरू असलेल्या विधानपरिषद शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने दिसून येऊ लागली आहेत. विखे यांच्या ताब्यात अनेक वर्षे असलेल्या श्री गणेश साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने विखेंच्या पॅनलच्या विरोधात भाजपचे विवेक कोल्हे यांनी पॅनल उभा केला. कोल्हेंच्या पॅनल मधील उमेदवारांच्या प्रचाराला काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निलेश लंके यांनी अक्षरशः झोकून दिल्याचे दिसून आले. गेल्या वर्षी पार पडलेली ही निवडणूक राज्यात गाजली आणि गणेश कारखान्याची सत्ता विखेंच्या हातून गेली.
निलेश लंकेंची हवा विधानसभेला पण दिसणार!!
त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश लंके यांनी डॉ.सुजय विखेंच्या विरोधात निवडणूक गाजवली आणि जिंकलीही. उमेदवारी घोषित होण्या अगोदर लंके यांनी खा.अमोल कोल्हे यांचे शिवपुत्र संभाजी महानाट्य आयोजित केले. या कार्यक्रमात हजेरी लावून विवेक कोल्हे यांनी लंके यांचे कौतुक करत अभिनंदन केले. या निमित्ताने निलेश लंके आणि विवेक कोल्हे यांची मैत्री पुन्हा पुढे आली. आता विवेक कोल्हे नाशिक शिक्षक विधानपरिषदेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार आहे. या निमित्ताने कोल्हे यांना पक्षातीत अनेक मित्रांची मदत नक्कीच होणार असे बोलले जात आहे.
लंके-कोल्हे या कारणांनी चर्चेत!!
-नगर मध्ये विवेक कोल्हे यांनी मंगळवारी विविध शिक्षक संघटना आणि प्रतिनिधींच्या पाठिंब्याच्या निमित्ताने मेळावा-बैठकी घेतल्या. यावेळी माध्यमांशी बोलताना कोल्हे यांना, जिल्ह्यात निलेश लंके आणि विवेक कोल्हे या दोन वेगवेगळ्या पक्षात असलेल्या नेत्यांबद्दल जिल्ह्यात विविध निवडणुकातील कामगिरी पाहता मोठी चर्चा असल्या बद्दल विचारले. यावर बोलताना कोल्हे यांनी, समाजामध्ये जो काम करतो, अन्यायाविरोधात आवाज उठवत असतो समाज त्यांना डोक्यावर घेत असतो. या दोन्ही गोष्टींचे आम्हां दोघात साम्य असल्याकारणाने कदाचित त्यामुळे लोकांमध्ये चर्चा होत असेल असं सूचक वक्तव्य स्मितहास्य करत केले. तसंच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काही राजकीय बदल दिसतील का यावरही बोलताना, बदल हा निसर्गाचा नियम आहे. हा बदल सातत्याने होत राहतो. राजकीय असो वा अराजकीय असो सर्व ठिकाणी बदल होत असतात. त्यामुळे भविष्यात फार बदल घडले तर मला आश्चर्य वाटणार नाही असं मोठं वक्तव्य विवेक कोल्हे यांनी करत विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात मोठी राजकीय उलथापालथ होईल असे भाकितच माध्यमांशी बोलताना एक प्रकारे केले.
विधानसभा निवडणुकीत नवी राजकीय समीकरणे!!
-जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात उमेदवारीवरून रस्सीखेच असणार आहे. महाविकास आघाडी पेक्षा महायुतीमध्ये अनेक मतदारसंघात आजी-माजी आणि इच्छुक स्पर्धेत आहेत. त्यात कोपरगाव मतदातसंघातील २०१९ च्या निवडणुकित घडलेल्या गोष्टींमुळे कोल्हे कुटुंब विखेंवर नाराज आहेत. ही नाराजी या-त्या कारणाने अनेकदा पुढे आली आहे. विधानपरिषद निवडणुकीचा निकाल येईल तो येईल, मात्र तरीही राहाता आणि कोपरगाव मतदातसंघात मोठा राजकीय ट्विस्ट असणार यात शंका नसल्याचे दिसून येत आहे. याची झलक नुकतीच शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हे यांच्या “मनधरणी” निमित्ताने दिसूनही आली आहे. त्यात विवेक कोल्हे हे भाजप कडून विधानपरिषद लढणार अशी चर्चा असताना त्यांना विधानपरिषद निवडणूक अपक्ष लढवावी लागत आहे. गेल्या वर्ष-दीड वर्षांपासून थोरात-कोल्हे-लंके चर्चेत आहेत. लोकसभा निवडणुकीत नगर उत्तर-दक्षिण नगर जिल्ह्यात विखें विरोधात मोठी एकसंघ राजकीय मोट दृश्य आणि अदृश्य स्वरूपात दिसून आल्याने जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्हीं जागांवर महाविकास आघाडीने मिळवलेला विजय विखेंसाठी मोठी राजकीय धोक्याची घंटा आहे. एकूणच जिल्ह्यात नव्याने तयार होत असलेल्या राजकीय समीकरणांत लंके-कोल्हे ही नावे चर्चेत आणि केंद्रस्थानी दिसून आल्यास आश्चर्य वाटणार नाही.