नगर:
लोकसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील नगर दक्षिण आणि शिर्डी मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी महायुतीला धोबी पछाड दिला आहे. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर 2009 पासून सलग तीन टर्म जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात महायुतीने आपले वर्चस्व कायम ठेवले. मात्र यंदा 2024च्या निवडणुकांत हे दोन्ही मतदारसंघ महाविकास आघाडीने आपल्याकडे अक्षरशः खेचून आणले. अर्थात राज्यातील लोकसभेचे एकूणच निकाल भाजप आणि त्यांच्या मित्रपक्ष शिवसेना(एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी(अजित पवार) यांच्या विरोधात आहेत. आणि त्यामुळेच अवघ्या चार महिन्यांवर आलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीवर या निकालांचे पडसाद उमटणार असे दिसून येत आहे.
राज्यातील दिडशेवर विधानसभा मतदारसंघात मविआच्या उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीत आघाडी घेतल्याने महायुतीमधील विशेष करून अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेतील अनेक आमदारांत चिंतेचे वातावरण आहे. यातील काहींनी मविआ मधील तीनही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधला असल्याचा दावा केला जात आहे. या परस्थितीत नगर जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटणार का याची उत्सुकता आहे. नगर दक्षिणेत सुजय विखे यांचा झालेला पराभव विखे परिवार आणि भाजपसाठी धक्का देणारा आहे. यात शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे 2014 आणि 2019 अशा सलग निवडून आल्या आहेत. मात्र राजळे यांचे मताधिक्य 2014 पेक्षा 2019ला घटल्याने तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभेत आ.राजळे, घुले बंधू अशी भक्कम बाजू असताना सुजय विखे यांना केवळ 7 हजार 841 मताधिक्य देऊ शकले आहेत. या मतदारसंघात नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचा मोठा जनसंपर्क तयार झाला असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रताप(काका) ढाकणे यांनी लंके यांच्या साठी जीवतोडुन काम केल्याचे दिसून आले. ढाकणे यांना अद्याप पर्यंत यशाने सातत्याने हुलकावणी दिली असली तरी यंदा मात्र त्यांना यश मिळेल असा विश्वास निर्माण करणारी परस्थिती निर्माण झाली आहे.
या परस्थितीत शेवगाव-पाथर्डी भाजपातही सर्व आलबेल नसल्याचे अनेक महिन्यांपासून दिसून येत आहे. आ.मोनिका राजळे यांना भाजप मधील एका गटाकडून मोठा विरोध होत असून तो अनेकदा जाहीर पणे प्रकट होताना दिसून आला आहे. जिल्हा,तालुका कार्यकारिणी पदाधिकारी निवडीवरून निर्माण झालेले नाराजी आणि राजीनामा नाट्य मध्यंतरी चांगलेच चर्चेत आले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोर नाराज गटाने दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा जयजयकार करत केलेली घोषणाबाजी हा गट राजळे यांच्यावर नाराज असल्याचे दर्शवणारी होती. या नाराजीची धुरा भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष, पंचायत समिती माजी सभापती गोकुळ दौंड यांनी खांद्यावर घेतल्याचे दिसून येत असून त्यांना कार्यकिरणीतील अनेक पदाधिकार्यांचा पाठिंबा असल्याचे लपून राहिलेले नाही. मध्यंतरी नाराजगटाने पंकजा मुंडे यांनी शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातुन विधानसभा निवडणूक लढवावी अशी गळ मुंडे यांना घातली होती. ही गळ पंकजा मुंडे यांनी त्यावेळी स्पष्ट शब्दात धुडकावली होती. मात्र बीड मधील त्यांच्या झालेल्या पराभवानंतर आणि प्रचारात मराठा-ओबीसी जातीय संघर्ष दिसून आल्यानंतर त्याचे पडसाद पाथर्डी मध्ये सध्या दिसून येत आहेत. हा संघर्ष विधानसभेला कायम राहणार का याचीही चिंता असणार आहे.
गोकुळ दौंड यांच्या बाबत सातत्याने समाज माध्यमातून येणाऱ्या पोस्ट मध्ये त्यांचा उल्लेख शेवगाव-पाथर्डीचे भावी आमदार म्हणून येत आहे. मतदारसंघात आता बदल अनिवार्य असल्याचे यातून सांगताना शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील शेती,पाणी,पाणी पुरवठा योजना,उद्योग, रस्ते,रोजगार, ऊसतोड कामगार आदी प्रश्नांना विद्यमान लोकप्रतिनिधींना जबाबदार धरून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बदल करणे अनिवार्य असल्याचे म्हंटले जात आहे. गोकुळ दौंड यांनी काहीशी नाव न घेता जाहीर भूमिका घेत विधानसभा निवडणूक लढवणार असे चित्र निर्माण केले आहे. अर्थात मतदारसंघात भाजपच्या राजळे विद्यमान आमदार असताना गोकुळ दौंड खरेच निवडणूक लढवणार असतील तर निवडणूक अपक्ष लढवणार की एखाद्या पक्षाची वाट धरणार याबद्दल अजून स्पष्टता त्यांच्या कडून आलेली नाही.
लोकसभेच्या निकालानंतर भाजपच्या झालेल्या पीछेहाटीला अनेक मतदारसंघात विद्यमान उमेदवारांबद्दल नाराजी स्पष्ट दिसत असताना उमेदवार न बदलल्याने पक्षाला हार पत्करावी लागल्याचे मंथन होत आहे. नगर जिल्ह्यातही त्याची प्रचिती आलेली आहे. पक्षाने केलेल्या सर्व्हे नुसार उमेदवार बदलले असते तर भाजपला या जागांवर विजय मिळवता आला असता याची उपरती भाजपला आता झाली असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार देताना याची पुनरावर्ती न करण्याचे धोरण तसेच उमेदवारांच्या नावाची घोषणा पुरेशा लवकर वेळेत केली जाणार असल्याची काळजी घेतली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
त्यामुळे नगर जिल्ह्यातील मतदारसंघात जनतेत नाराजी असल्याचे बोलले जात असलेल्या विद्यमान आमदारांतील काहींना उमेदवारी नाकारली जाणार का? हे पाहावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर गोकुळ दौंड यांनी निवडणूक लढवण्याचा चंग बांधल्याचे सध्यातरी दिसत आहे. यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेतला असून एक प्रकारे आपला प्रचार सुरू केला आहे. विद्यमान लोकप्रतिनिधी बद्दल बोलला जात असलेला नाराजीचा सूर, पक्षांतर्गत नाराजी आणि वंजारी समाजाचे असलेले प्राबल्य पाहता दौंड यांनी आपल्या उमेदवारीचा जोर लावल्याचे दिसून येत आहे.
एकीकडे महाविकास आघाडीकडून प्रताप ढाकणे यांनी अनेक महिन्यांपासून मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्यात लोकसभा प्रचारात त्यांनी निलेश लंकेच्या प्रचाराची धुरा मोठ्या धडाडीने निभावल्याने भाजपच्या मतदारसंघात शेवगावचे घुले बंधू सोबत असतानाही सुजय विखे यांना मोठे मताधिक्य मिळू शकलेले नाही. त्यामुळे मविआला एकूणच अनुकूल वातावरण असताना विधानसभेसाठी शेवगाव-पाथर्डी मतदारसंघ भाजपसाठी धोक्याच्या रेषेवर आहे. यात घुले बंधूंची भूमिका विधानसभेसाठी काय हे अद्याप गुलदस्त्यात आहे. घुले महायुती मध्ये असले तरी त्यांची भूमिका सुरुवातीला तळ्यात-मळ्यात दिसून आली. आता राज्यासह जिल्ह्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये चंद्रशेखर घुले यांच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे. मध्यंतरी कोरडगाव मंडळातील गावांचा दुष्काळी गावांत समावेश व्हावा म्हणून गोकुळ दौंड यांनी केलेल्या आंदोलनास क्षितिज घुले यांनी व्यासपीठावर येत जाहीर पाठिंबा दिला होता. त्याही वेळी दौंड आणि घुले यांची भूमिका राजळें विरोधात दिसून आली होती. प्राप्त परस्थितीत गोकुळ दौंड यांनी आपली एक भूमिका घेत एक प्रकारे प्रचारास सुरुवात केल्याने गोकुळ दौंड यांच्या भूमिकेचा भाजपला निश्चितपणे विचार करावा लागेल असे बोलले जात आहे. मात्र पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास ते खरंच निवडणूक लढवणारच का? किंवा कोणता पर्याय निवडणार हे निवडणूक जशी जवळ येईल तसे स्पष्ट होणार आहे.