नगर:
नगर दक्षिणेतील सुजय विखे विरुद्ध निलेश लंके यांच्यातील राजकीय अटीतटीची लढत राज्यात लक्षवेधी ठरत आहे. विखे परिवाराचा तगडा राजकीय वारसा, जिल्ह्यासह राज्यातील राजकारणात असलेला दबदबा आणि केंद्रीय शीर्ष नेतृत्वाशी असलेले थेट जवळकीचे संबंध पाहता सुजय विखे यांना सुरुवातीला सोपी वाटणारी लढत महाविकास आघाडीच्या निलेश ज्ञानदेव लंके यांच्या उमेदवारीने रंगतदार आणि अटीतटीची बनल्याचे चित्र आहे. जनतेत निलेश लंके यांची हवा असल्याचे महाविकास आघाडीचे नेते सांगत आहेत. तर महायुती कडून सुजय विखे गेल्या पाच वर्षात केलेली कामे मतदारांपुढे धडाक्यात मांडत आहेत. निलेश लंके यांच्या सुपा एमआयडीसी मधील कथित दहशत, खंडणी, अधिकाऱ्यांवरील दादागिरीचा मुद्दाही सध्या महायुती कडून जोरदार पणे चर्चेत आणला जात आहे. त्यामुळे एकूणच दोन्ही बाजूनी सध्या विकासाच्या मुद्यावरील निवडणूक कुठेतरी आरोप-प्रत्यारोपांच्या खाईत नेत मतदारसंघातील मूळ मुद्दे, प्रश्न चर्चेतून गायब केले जात आहेत का अशी शंका नागरिकांत आहे.
मुळात कोणतीही निवडणुकित अगोदरच्या कारकिर्दीत केलेल्या कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडून पुढील कारकिर्दीत अमुक-अमुक कामे करण्याचे नियोजन असल्याचा जाहीरनामा जनतेसमोर ठेवत निवडून देण्याचे आवाहन करणे एव्हढेच अपेक्षित असते. एखाद्या उमेदवाराची पाटी कोरी असेल तर त्याने ज्या सामाजिक, राजकीय किंवा सत्तेच्या पदावर असताना केलेल्या लोकोपयोगी कामांची माहिती देत निवडून दिल्यावर आपण या-या कामांना प्राधान्य देत आश्वासन पूर्ती करू याचा भरोसा देणारा जाहीरनामा अपेक्षित असतो. या अनुषंगाने पाहिल्यास नगर दक्षिणेतील सुजय विखे यांची खासदार या नात्याने तर निलेश लंके यांची आमदार म्हणून केलेली कामे आहेत. या अर्थाने दोन्ही उमेदवारांची पाटी तशी कोरी नाही. त्यामुळे दोन्ही उमेदवारांनी जनतेने का निवडून द्यावे हे सांगताना पुढील पाच वर्षांचा विकासाचा रोड मॅप जनतेसमोर ठेवणे अपेक्षित आहे.
तसे विद्यमान खा.सुजय विखे यांनी गेल्या पाच वर्षात वीस वर्षे प्रलंबित उड्डाणपूल, बाह्य वळण रस्ते, शहराला जोडणारे आणि लोकसभा मतदारसंघातुन जाणारे राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे विस्तारीकरण, केके रेंज जमीन अधिग्रहण विषय, केंद्र सरकारच्या विविध योजनांचा जनतेला झालेला फायदा आदी विषय जनतेसमोर मांडत पुढील पाच वर्षाच्या विकासकामांची ब्लु प्रिंट तयार असल्याचे जनतेसमोर सांगितले आहेत. तर माजी आ.निलेश लंके यांनी पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात विविध रस्ते मार्ग, पाणी योजना, सुपा एमआयडीसीचे विस्तारीकरण याच बरोबर जनतेशी 24 तास आपला कनेक्ट असल्याचे सांगत खासदार म्हणून निवडून आल्यावर प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी, आरोग्य सुविधा देण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेत “लंके” स्टाईल आवाज उठवू असे आश्वासन जनतेसमोर दिले आहे.
आता दोन्ही उमेदवारांची कारकीर्द जनतेसमोर असताना यावरच अधिक चर्चा, या चर्चेत नागरिकांचा, समाजातील विविध मान्यवर घटकांचा सहभाग घेत विकासतात्मक सखोल भूमिका नागरिकांना अपेक्षित असताना सध्या दोन्ही उमेदवारांकडून एकमेकांवर जोरदार चिखलफेक स्वतः अथवा आपल्या कार्यकर्त्यांच्या आणि सोशीलमीडियाचा आधार घेत सुरू असल्याचे आणि दुर्दैवाने त्याचीच अधिक चर्चा सुरू असल्याचे चित्र सध्या निवडणूक वातावरणात दिसून येत आहे. निलेश लंके यांनी सुजय विखेंवर गेल्या पाच वर्षात कुठलेही विकासाचे काम न केल्याचा आरोप केला आहे. विखे हे सामान्य जनतेचे फोन घेत नाही असाही मुद्दा त्यांनी पुढे आणला. त्यावर जाणकार लोकांनी स्थानिक समस्या या ग्रामपंचायत, नगरपालिका,महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या माध्यमातून सोडवायच्या असतात, त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी असतात अशात खासदार या नात्याने केंद्र सरकार कडून कोट्यवधींच्या योजना मतदारसंघात आणताना दिल्लीत तळ ठोकावा लागतो, मंत्री,सचिव यांच्या कडे पाठपुरावा करावा लागतो. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून स्थानिक जनसंपर्क हा तितका अपेक्षित ठेवून उपयोग नसतो. निश्चितच केंद्रीय पातळीवर सुटणारा एखादा प्रश्न मतदातसंघात उदभवला तर त्यासाठी खासदार या नात्याने तो जनतेकडून ऐकून घेऊन सोडवणे गरजेचे असते. गेल्या अनेक वर्षांपासून केके रेंज शेत जमीन अधिग्रहणाचा कळीचा मुद्दा प्रलंबित आहे. मध्यंतरी पुन्हा एकदा यावर मुदतीच्या अनुषंगाने नोटिफिकेशनचा मुद्दा पुढे आला. त्यावेळी खा.सुजय विखे, आ.प्राजक्त तनपुरे, मा.आ.निलेश लंके यांनी या मुद्यावर आवाज उठवला. सत्तेतील खासदार या नात्याने सुजय विखे आदींनी संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जाणार नाहीत याबाबत राजनाथसिंह यांनी आश्वासित केल्याचे याबाबत विखे यांनी सांगितले आहे.
सुजय विखे यांनीही निलेश लंकें अंगुलीनिर्देश करणारे सुपा एमआयडीसी मधील गुंडगिरी,दहशत आणि खंडणी बाबत आरोप केले आहेत. तसेच पारनेर मतदातसंघातील प्रलंबित विकाकामांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आरोप केले आहेत. शरद पवारांना सोडून अजित पवारांकडे जात अवघ्या आठ महिन्यात पुन्हा खासदारकी लढवण्यासाठी शरद पवारांकडे आल्याबाबतही लंकेंच्या पक्ष आणि व्यक्ती निष्ठेवर महायुती कडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आता विखे परिवाराच्या संपत्ती वाटपाचा अगदी वैयक्तिक मुद्दा विखे परिवारातील एका सदस्यास्याचा हवाला देत चर्चेत आणला जात आहे. तर विळद येथील विखेंच्या शैक्षणिक, वैद्यकीय संस्थांना महापालिकेकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्या बाबत थकीत तीन कोटी बिलांचा मुद्दाही पुढे आणला जात आहे. विखे आरोपीच्या बुलेटवर बसल्याचे व्हिडीओ असोत वा सुजय विखे पारनेरच्या एका गावात 60 टक्के मते घेणार आल्याच्या दावा व गोळ्या घालण्याची भाषा अशी कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होणे असे प्रकार सुरू दिसून येत आहेत. एकूणच दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असल्याचे दिसून येत आहेत.