नगर:
महाविकास आघाडी कडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून लोकसभा निवडणूक लढवणारे माजी आ.निलेश लंके सध्या चांगलेच चर्चेत आहेत. वास्तविक दिग्गज समजले जाणारे विखे परिवारातील विद्यमान खा.सुजय विखे यांच्या विरोधात निलेश लंके यांनी आव्हान उभे केले आहे. नुकतीच त्यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेची सुरुवात मोहटादेवी गडावरून सुरू झाली असून यात्रा अजूनही पाथर्डी-शेवगाव तालुक्यात आहे. या दरम्यान निलेश लंके वाटेवर येणाऱ्या सर्व गावात नागरिकांना भेटत असून मतदारांना आपल्याला मत देण्याचे आवाहन करत आहेत. पाथर्डी तालुक्यात लंके यांचा जास्त जनसंपर्क मानला जातो. अशात शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातुन त्यांना मताधिक्य मिळण्याची अपेक्षा अधिकची आहे.
अशात तिसगाव येथे निलेश लंके यांच्या कडून मतदारांच्या भेटीगाठीचे जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने चौक सभेचे देखील नियोजन होते परंतु चौक सभेचे नियोजन न झाल्यामुळे लंके यांनी आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांवर नाराजी व्यक्त करत शिरापूरकडे रवाना झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. आजच्या दौऱ्यात आमदार प्राजक्त तनपुरे देखील सोबत होते. याची दिवसभर तिसगावमध्ये चर्चा सुरु असल्याचे बोलले जातेय. काही डिजिटल माध्यमातून तशा बातम्याही प्रसिद्ध झाल्या असून निलेश लंके नागरिकांशी संवाद साधल्यानंतर मोटारसायकल वरून पुढील ठिकाणी रवाना होताना व्हिडीओ प्रसिद्ध झाले आहेत. याबाबत काही स्थानिकांकडून दौऱ्यात पुढील ठिकाणी पोहचण्याचा उशीर होत असल्याने लंके यांची यात्रा तीसगाव मधून पुढे गेली अशी माहिती सांगण्यात आली. वेळेवर पोहचता यावे आणि वाटेत दिसेल त्याला भेटता म्हणून लंके आणि आ.तनपुरे यांनी मोटारसायकलवर प्रवास केला असे सांगण्यात आले. तर काहींनी नियोजन फिस्कटल्याचे कारण दिल्याचे बोलले जाते. एकूणच नगर दक्षिणेत प्रचार मोहिमेत दोन्ही उमेदवारांकडून अटीतटीची लढत सुरू झाली असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाली आहे