विसापूरखालील क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी दोन दिवसांनी आवर्तन कालावधी वाढवण्यास मंजुरी
श्रीगोंदा(प्रतिनिधी):
उन्हाळी हंगामा संदर्भात कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री तथा कुकडी कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच काही दिवसांपूर्वी पुणे येथे संपन्न झाली होती.
या बैठकीत श्रीगोंदा तालुक्याच्या वाटेला ६.५ दिवसाचं आवर्तन नियोजित होतं. परंतु ६.५ दिवसाच्या आवर्तनामध्ये विसापूर तलाव व कालवा याचे अंदाजे ५,५०० हेक्टर क्षेत्रासाठी आवर्तन करणे शक्य नव्हते. तर विसापूरखालील ५,५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी २०० ते २५० mcft पाण्याची अतिरिक्त आवश्यकता होती.
त्यानुसार माणिकडोह व वडज या दोन धरणांतून साधारणतः २०० mcft एवढे अतिरिक्त पाणी सोडण्याचे निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यामुळे दोन दिवसांनी आवर्तन कालावधी वाढवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे विसापूरखालील लाभ धारकांना याचा फायदा होणार आहे. ऐनवेळी हंगामामध्ये असा निर्णय घेतल्यामुळे दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. यावेळी जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले, राष्ट्रवादीचे राज्यकार्यकारिणी सदस्य प्रशांत गायकवाड उपस्थित होते.
अजितदादां लंकेंवर नाराज!!
पारनेरचे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे आ.निलेश लंके राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर असून लोकसभा निवडणूक महायुतीच्या विरोधात लढवण्याच्या तयारीत आहेत. याची कल्पना अजित पवारांना आली असल्याने अजितदादा लंके यांच्यावर नाराज झाल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर खा.सुजय विखे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या झालेल्या भेटीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील राजकीय सद्य परिस्थिती अजितदादांनी जाणून घेतल्याची माहिती आहे. प्रत्येक्ष प्रचारास सुरुवात झाल्यानंतर मतदारसंघात येऊन प्रचारसभांसह वैयक्तिक पातळीवर राजकीय जुळवाजुळव करण्यास मदत करणार असल्याचे संगीतले जात आहे. आ.लंके यांची भूमिका अजित पवार यांना जिव्हारी लागली असून बदलत्या राजकीय परिस्थितीत महायुतीत आपले स्थान भक्कम ठेवण्यासाठी महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांना निवडून आणण्याचा चंगच अजितदादांनी बांधला असल्याचे बोलले जात आहे.