नगर:
आचारसंहिता घोषित होण्यापूर्वी केवळ दोन दिवस अगोदर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत भाजप,राष्ट्रवादी अजित पवार गट आणि एक काँग्रेस नेत्याच्या साखर कारखान्याला तब्बल 1900 कोटींची कर्जहमी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सत्ताधाऱ्यांच्या साखर कारखान्यांसाठी हा निर्णय घाईघाईने घेतल्याचे बोलले जात आहे.
राज्यातील सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील अनेक साखर कारखान्यांनी सरकारकडे खेळत्या भांडवलावरील कर्जाच्या मागणीचे प्रस्ताव सरकारकडे पाठविले गेले होते. लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजून आचारसंहिता लागू शकते या अंदाजाने आणि लोकसभा निवडणुकीत ऊस उत्पादक पट्यात आणि त्याच बरोबर आपल्यासोबत असलेल्या किंवा येऊ शकणाऱ्या साखर कारखानदार आमदारांच्या नाराजीचा फटका बसू नये याची काळजी घेत शिंदे-फडणवीस-अजित पवार महायुती सरकारने भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या 13 साखर कारखान्यांना 1898 कोटींचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यासाठी राज्य सरकार स्वत:च जबाबदारी घेणार असून राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून कर्ज घेऊन हे कर्ज निवडक कारखान्यांना देणार असून त्याबाबतच्या प्रस्तावास आचारसंहिता लागण्यापूर्वी दोनएक दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ उपसमितीने मान्यता दिल्याची माहिती समजते आहे.
या साठीच्या समितीने 13 कारखान्यांची निवड केली असल्याचे समजते. त्यामध्ये भाजप नेत्यांसंबंधित 5 राष्ट्रवादीचे 7 आणि एक कारखाना काँग्रेसशी संबंधित आमदाराचा असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांना आपलेसे करण्यासाठी राजगड सहकारी साखर कारखान्यास 70 कोटी रुपयांची कर्जहमी देण्यात आली आहे. कर्जहमीचा प्रस्ताव एनसीडीसीला पाठविण्यात आला असून त्यांची मान्यता आल्यानंतर कर्जाची कर्ज रक्कम सरकारकडे जमा होईल.
सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार अजित पवार गटाच्या..
लोकनेते सुंदररावजी सोळंके साखर कारखाना (बीड) 104 कोटी,
किसनवीर (सातारा)350 कोटी,
किसनवीर (खंडाळा) 150 कोटी,
लोकनेते मारोतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखाना(नेवासा) 150 कोटी,
अगस्ती (अहमदनगर) 100 कोटी,
अंबाजोगाई (बीड)80 कोटी,
शिवाजीराव नागवडे (श्रीगोंदा) 110 कोटी..
तर भाजपशी संबंधित असलेल्या
संत दामाजी(मंगळवेढा)100 कोटी,
वृद्धेश्वर (पाथर्डी)99 कोटी,
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे ( कोपरगाव) 125 कोटी,
तात्यासाहेब कोरे वारणानगर (कोल्हापूर) 350 कोटी,
बसवराज पाटील यांचा विठ्ठलसाई (धाराशिव) 100 कोटी या रकमेचे कर्ज मंजूर प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे.