पारनेर(प्रतिनिधी):
कुकडी डावा कालव्याच्या रब्बी हंगामाचे आवर्तन 1 मार्च रोजी तर पिंपळगांवजोगा कालव्याचे आवर्तन 26 फेब्रुवारीपासून सोडण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पुणे येथे पार पडलेल्या कुकडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहीती आमदार नीलेश लंके यांनी दिली.
रब्बी हंगामातील विशेषतः कांंद्याचे पिक पाण्याअभावी जळण्याची शक्यता निर्माण झाल्याने पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार नीलेश लंके यांची भेट घेऊन कुकडी तसेच पिंपळगांजोगा कालव्याचे आवर्तन लवकर सोडण्याची सोडण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन आ. लंके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत लवकरात लवकर आवर्तन सोडण्याची मागणी केली होती.
पारनेर तालुक्यात झालेल्या गारपीटीसह अवकाळी पावसामुळे कांद्याची रोपे तसेच लागवड करण्यात आलेले कांद्याचे पिक नामशेष झाले होते. त्यामुळे पुन्हा कांदा रोपांची निर्मीती करून कांदा लागवड करण्यात आली. निसर्गाच्या अवकृपेमुळे लागवडीस उशिर झाल्याने या पिकासाठी पाण्याची आवष्यकता होती. पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेउन श्रीगोंदे, कर्जत, जामखेड आदी तालुक्यांना आवष्यकता नसेल तर किमान पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दहा दिवसांचे आवर्तन सोडावे अशीही गळ आ. लंके यांनी उपमुख्यमंत्र्यांना घातली होती.
कुकडी कालवा सल्लागार समितीच्या शनिवारी सकाळी पार पडलेल्या बैठकीत पारनेर तालुक्याची मागणी तसेच श्रीगोंदे, कर्जत, जामखेड तालुक्याच्या मागणीचा मेळ घालून कुकडीचे आवर्तन येत्या १ मार्चपासून तर पिंपळगांवजोगा कालव्याचे आवर्तन येत्या २६ फेब्रुवारीपासून सोडण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचे आ. लंके यांनी सांगितले.
बैठकीस जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसह खा. सुप्रिया सुळे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आ. रोहित पवार, आ. अतुल बेनके, आ. प्रा. राम शिंदे आदी उपस्थित हेाते.
झोपी गेलेेले जागे झाले !
कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन आमदार नीलेश लंके यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केल्यानंतर झोपी गेलेले तालुक्यातील काही मंडळी जागे झाले व त्यांनी निवेदन देण्याचा फार्स करीत श्रेयासाठी केविलवाणी धडपड केली.
सुदाम पवार, माजी सभापती
अनिल गंधाक्ते, सदस्य, ग्रामपंचायत, वडझिरे

