मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोबाईलवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. नाटकांसाठी असलेल्या सेन्सॉरशीपच्या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरे यांनी ही मागणी केली आहे. नाटकासाठी सेन्सॉरशीप आहे. पण इंटरनेटमुळे सर्व तुमच्या आवाक्यात आलंय. लोक आज ओटीटी प्लॅटफॉर्म पाहत आहेत. त्यासमोर नाटक वगैरे काही नाही. तुम्ही आधी मोबाईलवर बंदी घाला. त्यावर जे चालू असतं ना त्याला सेन्सॉर वगैरे काही नाही. आईबापच नाही त्याला. झालं तर त्यामुळे कॉम्प्लेक्शन कमी होईल, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलंय.
अखिल भारतीय नाट्य संमेलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी हे विधान केलं. 1995 नंतर आपल्या आयुष्याला वेग आला. 95-96ला मोबाईल आलं. इंटरनेट आलं. टेलिव्हिजन चॅनल आले. 572 चॅनल्स आहेत. सर्वात जास्त मोबाईल आपल्याच देशात आहे. 82 कोटी फोन आहेत. सर्वच फोनवर आणि देश व्हेंटिलेटरवर आहे. मध्यमवर्ग गेला. त्यातून आपलं नुकसान झालं. तुम्ही कोणत्या पक्षाला मतदान करता याचं घेणं नाही. तुम्ही कोणत्या पक्षाला फॉलो करता याचंही मला घेणं नाही. पण मध्यमवर्गाने राजकारणात यावं. राजकारणा उडी घ्या. पुढाकार घ्या. सुशिक्षित असून चालणार नाही, सूज्ञ असावं लागतं. महाराष्ट्राला सूज्ञ लोकांची गरज आहे, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.
महाराष्ट्र देशाला दिशा देतो. महाराष्ट्र विचार देतो. कोणतीही गोष्ट घ्या, महाराष्ट्रातील आहे. शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि टिळकही इथूनच गेले. पण तोच महाराष्ट्र आज चाचपडत असेल तर ही धोक्याची घंटा आहे. जातीपाती सारख्या फालतू गोष्टीत बरबटून जाऊ नका. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये त्याने काय झालं ते पाहा. आता ओबीसी विरुद्ध मराठा हे सुरू आहे. हे कोणी तरी करत आहे, घडवत आहे. महाराष्ट्र एकसंघ राहू नये म्हणून कोणी तरी करत आहे.