जळगाव: येत्या 10 जानेवारी रोजी आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय देणार आहे. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या निकालावर शिंदे गटाचं आणि राज्य सरकारचं भवितव्य ठरणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवलं तर नुसतेच आमदार अपात्र होणार नाहीत तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा ताबा मिळण्याचा उद्धव ठाकरे गटाचा मार्ग मोकळा होणार आहे. तर, शिंदे गटाचे आमदार पात्र ठरल्यास उद्धव ठाकरे यांच्या हातून कायमचा पक्ष आणि चिन्ह जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच दोन्ही गटातील नेते, पदाधिकारी, आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी मोठं विधान केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र होणार आहेत. येत्या 10 तारखेला त्यांचा निकाल लागणार आहे, असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. त्यावर राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट उत्तर देत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. आता युद्धाची तयारी सुरू झाली असून यावेळी मोठमोठ्या वावड्या उठवल्या जात आहेत. कुणी काय सांगत तर कुणी काय सांगतं? येत्या 10 तारखेला आमचं काय होईल? 10 तारखेला.. आम्हाला श्रद्धांजली अर्पण होते की आम्ही शहीद होतो.. ते काय होत आम्ही बघून घेऊ, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.