नगर:
आज शुक्रवारी अकोले शहरात दिवंगत अशोकराव भांगरे यांच्या ६१ व्या जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित आहेत.
पवार साहेब नगर जिल्ह्यात काल गुरुवारी मुक्कामी होते तर आज ते अकोले इथे आहेत. दरम्यान विधानसभा निवडणुका अगदी नजीक आलेल्या असताना साहेब जिल्ह्यात असताना अनेक राजकीय चर्चांना पेव फुटले आहे.अकोले तालुक्यातील जेष्ठनेते माजीमंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र माजी आ.वैभव पिचड हे शरद पवार यांच्या भेटीसाठी उत्सुक असून त्यांनी पवार साहेबांना भेटीची वेळ मागितली असल्याची चर्चा जोरदारपणे सुरू आहे. मात्र ही चर्चा सुरू असतानाच आणि पवार आज अकोल्यातच असताना दरम्यान माजी आ.वैभव पिचड यांनी माध्यमातून येणाऱ्या बातम्यांवर खुलासा केला आहे.
पिचड कुटुंब २०१४ विधानसभा निवडणुकां पर्यंत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत होते. पिचड यांना पवारांचे खंदे समर्थक म्हणून पाहिले जात होते. मात्र २०१९ निवडणुकी पूर्वी पिचड पिता-पुत्र भाजपवासी झाले. मात्र भाजप कडून विधानसभा निवडणूक लढवताना वैभव पिचड यांचा दारुण पराभव झाला.
त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ किरण लहानटे यांनी त्यांचा जवळपास ५५ हजार मतांनी पराभव केला. एक प्रकारे पक्ष बदलून पिचडांना हाराकीरी पत्करावी लागली असे बोलले जाते. आता आ.लहामटे राष्ट्रवादी मधील फुटी नंतर अजित पवार गटात आहेत. त्यामुळे महायुतीत विद्यमान आ.लहामटे असताना वैभव पिचडांचे राजकीय भवितव्य काय असा प्रश्न आहे. यामुळेच पिचड पुन्हा शरद पवार यांच्या सोबत जात २०१४ ची निवडणूक लढवणार या शक्यतेने अफवांचा बाजार उठला आहे.
एकूणच एकीकडे पिचड पवारांच्या संपर्कासाठी आणि भेटीसाठी आसुसले आहेत या अर्थाने बातम्या माध्यमात येत असताना आता खुद्द वैभव पिचड यांनी यावर खुलासा केला आहे. खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या खुलाश्यात वैभव पिचड यांनी आम्हीं राष्ट्रवादी सोडून भाजपात आलो असून भाजपात रमलो आहोत असे वक्तव्य करत शरद पवार भेटीचे वृत्त फेटाळले आहे. पवार साहेब आज अकोल्यात असताना आमच्या राजकीय विरोधकांनीच अशा पद्धतीच्या बातम्या पेरल्या असल्याचा काहीसा आरोपही वैभव पिचड यांनी केला आहे.
अर्थात विधानसभा निवडणुका उंबरठ्यावर असताना आ.लहामटे जर महायुती कडून विद्यमान आमदार या दाव्याने मैदानात असतील तर पिचड थांबणार का?? असाही प्रश्न आहे. किंवा त्यांना भाजप कडून काही “संकेत” मिळाले आहेत. आपल्या राजकीय भवितव्यासाठी त्यांना काहीतरी निर्णय घेणे क्रमप्राप्त असताना ते काय निर्णय घेणार याची उत्सुकता निश्चितच आहे. अर्थात घोडा मैदान नजीक असताना येत्या काही दिवसांत राजकीय उलथापालथी संभवीत आहे याबद्दल शंका नसावी.