नगर:
2019 पासून राज्यातील राजकारणाने कधी नव्हे इतकी राजकीय वळणे पाहिली आहेत. या दरम्यान चार मोठे राजकीय भुकंप झाले. पहिला भूकंप उद्धव ठाकरे यांनी भाजप युती तोडत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सोबत येत महाविकास आघाडीत सामील होत केला. मविआ सरकार स्थापन होण्याची प्रक्रिया सुरू असतानाच लागलीच अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गाजलेला “पहाटेचा शपथविधी” पार पाडत दुसरा राजकिय भूकंप केला. त्यानंतर मविआ सरकारला अडीच वर्षे पूर्ण होताच जून 2022 ला एकनाथ शिंदे यांनी चाळीसवर शिवसेनेचे आमदार आणि 10 अपक्ष आमदार सोबत घेत सरकारमधून बाहेर पडत तिसरा मोठा धक्का दिला. तर वर्षभरानंतर जुलै 2023 ला अजित पवार यांनी आपल्या विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस मधील चाळीस आमदार आणि काही अपक्षांसह शरद पवारांविरोधात बगावत करत शिंदे-फडणवीस सरकार मध्ये सहभागी होत मोठा राजकीय भूकंप घडवून आणला.
एकूणच 2019 ते 2024 पर्यंत अनेकदा शपथविधी नंतर मंत्रीमंडळात फेरबदल होत असताना महायुती मधील काहींना मंत्रीपदे मिळाली तर अनेकजण वाट पहात मंत्रिपदाच्या रांगेत आहेत. आता पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना उधाण आले असून चालू विधानसभा संपण्यास चार महिन्यांपेक्षा कमी कालावधी असला तरी अनेक इच्छुक या स्पर्धेत असल्याचे दिसून येत आहे. 2022 मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या सोबत गेलेले अनेक इच्छुक दोन वर्षांपासून गुडघ्याला बांशीग बांधून तयार आहेत. यातील काहीजणांनी शपथविधी साठी शिवलेल्या “सूट” वरून मिश्किल टिप्पण्या झाल्याने तो एक काहीसा चेष्टेचा विषय होऊन बसला होता. मात्र अनेकदा मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या आल्या पण त्या वावड्याच ठरल्याने अनेकजण हिरमसून आहेत. अशात आता पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या येत असल्याने अनेकांचे चेहरे खुलले असून याबाबत कधी अधिकृत घोषणा होते आणि त्यात आपले नाव असण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
वास्तविक विधानसभा निवडणुकीला अवघे तीन-चार महिने बाकी असताना मंत्रिमंडळ विस्तार होणार का? या बद्दल शंका आहे. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला केवळ 19 जागांवर विजय मिळाल्याने महायुतीत धाकधूक वाढली आहे. अशात मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळावरील नियुक्त्या करून डॅमेज कंट्रोल करत विधानसभेला सामोरे गेल्यास त्याचा फायदा होईल या अपेक्षेने मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वाढली आहे. या माध्यमातून अधिक फटका बसलेल्या जिल्ह्यांतील आमदारांची वर्णी मंत्रिमंडळात लावून तेथे पक्षाची आणि महायुतीची ताकत वाढवता येणार आहे.
नगर जिल्ह्याचा विचार करता लोकसभा निवडणुकीत महायुतीला दोन्हीही जागा गमवाव्या लागल्या आहेत. ठाकरे सरकार मध्ये बाळासाहेब थोरात(काँग्रेस), शंकरराव गडाख(शिवसेना) आणि प्राजक्त तनपुरे(राष्ट्रवादी काँग्रेस) अशा तिघांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते. त्यानंतर मात्र एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात केवळ राधाकृष्ण विखे यांचाच समावेश झाला. अजित पवार महायुतीत आल्यानंतरही नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे चार आमदार सोबत असतानाही कुणाची वर्णी लागू शकली नाही. मात्र लोकसभेतील पराभव पाहता संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून एका आमदाराला निश्चित स्थान मिळू शकते.
यात नगर शहराचे आ.संग्राम जगताप यांना सर्वाधिक संधी आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांच्या सोबत गेलेले निलेश लंके हे शरद पवार यांच्या सोबत आल्याने आता संग्राम जगताप, आशुतोष काळे आणि किरण लहामटे हे तीन आमदार अजितदादां सोबत आहेत. यात काळे आणि लहामटे यांची ही पहिलीच टर्म आहे. त्यामुळे 2014 आणि 2019 असे सलग दोन टर्म जिंकून आलेले आ.संग्राम जगताप यांची संभाव्य मंत्रिमंडळात वर्णी निश्चित म्हणावी लागेल. त्यांना विधिमंडळ कामकाजाचा मोठा अनुभव पाठीशी असून अनेक मुद्यांवर त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच आ.जगताप हे अजितदादांचे विश्वासू गटातील आहेत. अजितदादांनी शरद पवार यांच्याशी बगावत केल्यानंतर सर्वात आधी आ.जगताप त्यांच्या सोबत दिसून आले. किरण लहामटे यांनी त्यावेळी तळ्यात-मळ्यात करत नंतर दादांकडे जाणे पसंत केले, तर आशुतोष काळे यांनी विदेशातुन आल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली. 2019 ला पहाटेचा शपथविधी पार पडला त्याही वेळी अजित पवारांसोबत जे आमदार होते त्यात आ. संग्राम जगताप यांचे नाव समोर आले होते.
एकूणच आ. संग्राम जगताप यांची अजितदादांशी असलेली जवळीक त्यांना मंत्रिमंडळ विस्तारात पूरक ठरणार आहे. त्याच बरोबर आ.जगताप गेली दहा वर्षे आमदार आहेत. शहरातील राजकारणावर त्यांची मोठी पकड असल्याने येणारी विधानसभा त्यांना जड मानली जात नाही. त्यामुळे ते जिल्ह्यातील इतर मतदातसंघात लक्ष देत पक्ष आणि महायुतीसाठी फायद्याचे ठरतील. आ.जगताप यांचा नगरसह श्रीगोंदा, पाथर्डी आदी मतदारसंघात जनसंपर्क आहे. महायुतीत भाजप कडे राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून असलेले मंत्रिपद उत्तरेत असल्याने आ.जगताप यांच्या निमित्ताने दक्षिण नगर जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्थान देत समतोल साधला जाणार आहे. त्यामुळे संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात आ.संग्राम जगताप हे नामदार संग्राम जगताप झाल्याचे पाहण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते आणि चाहते नक्कीच आसुसले असणार आहेत.