दोघांच्या लढाईत रुपवते बाजी मारणार!! ..की कुणाला अडचणीत आणणार??
नगर:
उत्कर्षा रुपवते यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत वंचित मध्ये प्रवेश केला आहे. उत्कर्षा रुपवते यांचा वंचित मधील पक्षप्रवेश केवळ काँग्रेसलाच धक्का नसून महाविकास आघाडीचे ठाकरे शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना धोक्याची घंटा आहे. कारण उत्कर्षा रुपवते या काँग्रेस मधील उत्तर नगर जिल्ह्यात विशेषतः अकोले,संगमनेर आदी भागातील मोठ्या नेत्या आहेत. अनेक वर्षे काँग्रेस निष्ठावान म्हणून काम करताना त्यांनी पक्षीय राजकारणा बरोबरच सामाजिक,शैक्षणिक, आदिवासी यावर बरेच काम करत स्थानिक जनसंपर्क ठेवलेला आहे. अर्थात त्यांच्या माध्यमातून मिळणारी मते ही महाविकास आघाडीच्या उमेदवारास अर्थात भाऊसाहेब वाकचौरे यांना मिळणार होती ती मते आता एकगठ्ठा वाकचौरे यांच्यापासून दुरावणार आहेत. तर वंचितच्या उमेदवार म्हणून त्यांना अर्थात महाविकास आघाडीकडे जाणारी वंचितच्या मतांच्या टक्यात वाढ होऊन त्याचाही फटका वाकचौरे यांनाच बसण्याची शक्यता अधिक आहे. या परस्थितीत महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार विद्यमान खा.सदाशिव लोखंडे यांना याचा कसा फायदा मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
शिर्डीची लढत ही काल पर्यंत विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे आणि माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या भोवतीच फिरत होती. त्यात खा.लोखंडे यांच्याबद्दल मतदारांच्यात नाराजीचा सूर समाज माध्यमातून स्पष्टपणे दिसून येत होता. लोखंडे यांच्याबद्दल अनेक तक्रारी महायुती मधील नेत्यांत बोलल्या जात होत्या. खुद्द पालकमंत्री त्यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती. मात्र नंतर लोखंडे यांनी विखे परिवाराशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती असल्याने आणि विखे यांनीही मतभेदांपेक्षा उमेदवार निवडून आणणे त्यांच्या राज्यातील राजकीय भविष्यासाठी महत्वाचे असल्याने कामाला सुरुवात केली होती. मात्र जनतेतील रोष स्पष्टपणे दिसत असल्याने आता उत्कर्षा रुपवते यांनी वंचित मध्ये प्रवेश केल्याने सदाशिव लोखंडे यांना हायसे वाटले असणार असून वाकचौरे यांची मात्र नाही म्हंटले तरी धाकधूक वाढली असणार आहे.
आता शिर्डी लोकसभेची लढत दुरंगी ऐवजी तिरंगी होणार आहे. त्यात प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनीही अपक्ष उमेदवारी करण्याचे घोषित केले आहे. एकूणच उत्कर्षा रुपवते यांच्या वंचितच्या माध्यमातून एंट्रीने शिर्डीची एकतर्फी वाटणारी लढत आता सर्वच उमेदवारांना तितकीशी सोपी राहिली नसून या निवडणुकीत उत्कर्षा रुपवते “की फॅक्टर” ठरत चर्चेच्या केंद्रस्थानी राहणार यात शंका नाही.