नगर:
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ कधी नव्हे तो इतका “हॉट स्पॉट” यंदा बनल्याचे चित्र आहे. एकीकडे अनेक पिढ्यांची मोठी राजकीय पार्श्वभूमी, उच्चशिक्षित डॉक्टर उमेदवार, वैयक्तिक संस्थात्मक आणि संघटनात्मक जाळे, पाच वर्षांच्या हजारो कोटींच्या शाश्वत विकासात्मक कामांनी भरलेली पाटी, मोदींच्या जादूसह केंद्रात आणि राज्यात असलेल्या सरकारचे उमेदवार सुजय विखे पाटील तर दुसऱ्या बाजूला एक शिक्षकाचा मुलगा,गावचा ग्रामपंचायत सदस्य-सरपंच ते तालुक्याचा आमदार असा अल्प राजकीय मात्र राज्यात ठसा उमटवणारा प्रवास, तुलनात्मक कमी शिक्षण पण मोठे व्यावहारिक, संघटनात्मक कला, प्रश्नांना भिडून सोडवणूक करण्याची वृत्ती, लोकसभेसाठी पहिल्यांदाच उमेदवारी असल्याने कोरी पाटी तरीही जनमानसांत विशेषतः युवा वर्गात आकर्षण निर्माण केलेले महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके. अशी लढत वरवर सामान्य वाटत असली तरी आता दोन्ही बाजूंनी काहीही करून निवडणूक जिंकायचीच अशी जिद्द असल्याने नगर दक्षिणेतील निवडणुकीचे वातावरण उमेदवारी अर्ज दाखल होण्यापूर्वीच चांगलेच गरम आणि ढवळून निघत आहे.
निलेश लंके यांनी सुरुवातीला अनेक दिवस आपल्या पक्षांतराचा आणि उमेदवारीचा संस्पेन्स ताणून धरला. अखेर मागील मागील महिन्याच्या 29 तारखेला त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश करत हातात तुतारी पकडली. आणि मग खऱ्या अर्थाने निवडणुकीत रंगत निर्माण झाली. निलेश लंके की राणी लंके हा संस्पेन्सही चर्चेत राहिला. या नंतर 1 एप्रिलच्या मुहूर्तावर निलेश लंके यांनी मोहटादेवी गडावर देवीचे दर्शन घेऊन स्वाभिमान जनसंवाद यात्रेला प्रारंभ करत मतदारसंघात सातही तालुक्यात धुमधडाक्यात यात्रा सुरू ठेवली. यात्रेचा आता शेवटचा टप्पा असून 19 एप्रिल रोजी नगर मध्ये यात्रेची सांगता होणार आहे. यात्रेची सुरुवात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत तर सांगता राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत करत लंके यांनी यात्रा चर्चेत ठेवली असेच म्हणावे लागेल.
एकीकडे जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने निलेश लंके हवा करत चर्चेत असताना दुसरी कडे महायुतीचे उमेदवार खा.सुजय विखे पाटील यांनी पदाधिकारी-कार्यकर्ते यांच्या संघटनात्मक बैठकांवर जोर दिला. बातम्यांत जास्त न झळकता सुजय विखे यांनी महायुती मधील राष्ट्रवादी, शिवसेना, आरपीआय या पक्षांची मोट बांधत मतदारसंघातील सर्व तालुका पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एकत्रित करत प्रचारपूर्व मेळावे घेण्यावर भर दिला. अगदी शांततेत विखे यांनी काम करण्यामागे धोरणात्मक रणनीती असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा मतदारसंघ भौगोलिक क्षेत्रफळाने मोठा असतो, नगर दक्षिणेत सात तालुक्यातील जवळपास 19 लाख मतदारांपर्यंत घर ते घर जात उमेदवाराचे नाव,पक्ष चिन्ह पोहचवणे गरजेचे असते. तर सभा-मेळावे आणि रॅलीतून जनतेपर्यंत भूमिका पोहचवावी लागते. सुजय विखे यांनी याच पातळीवर शिस्तबद्ध काम उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर सुरू केले. नाराजांची नाराजी त्यांनी पहिल्या टप्यात दूर करण्यात यश मिळवत भाजप मधील सर्व नेते, गट यांचे समाधान करण्याचे काम केले. प्रसंगी त्यांनी जाहीर माफी मागत महत्वाच्या नेत्यांच्या घरी जाऊन गैरसमज दूर केले. परिणामी नाराज समजला जाणारा गट आता तालुका-तालुक्यात संघटित झाला असून नेते मंडळी विखेंच्या खांद्याला खांदा लावून मेळाव्यांना उपस्थित रहात आहेत.
उमेदवारांचा भर कशावर??
दोन्ही उमेदवारांत, विकासाच्या मुद्यावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात झालेल्या योजना, विकासकामे, देशाची पोहचली जागतिक स्तरावरील ओळख यावर सुजय विखे भर देत आहेत. विरोधकांच्या टिकेकडे दुर्लक्ष करा, आपण केलेली विकासकामे जनतेसमोर ठेवा, पुढील उद्दीष्ठे जनतेला सांगा आणि नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीला मत द्या, या अनुषंगाने सुजय विखे यांनी काम सुरू केले असून त्यादृष्टीने कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तर निलेश लंके यांची पाटी कोरी असली तरी पारनेर मतदारसंघात केलेली विकासकामांची जंत्री ते मतदारासमोर ठेवत आहेत. तसेच निवडणून आल्यावर उच्च शिक्षणासह, वैद्यकीय शिक्षणावर त्यांनी भर दिला असून प्रत्येक तालुक्यात त्यास मंजुरी आणू असे आश्वासन दिले आहे. वेळ प्रसंगी दिल्लीत रस्त्यावर उतरून मतदारसंघातील कामांसाठी आवाज उठवू असा लंके स्टाईल इशारा त्यांनी देऊन ठेवला आहे. लंके यांच्या धडाकेबाज भाषणांची सध्या चर्चा आहे. विरोधी उमेदवारांवर त्यांच्या सभेतून जोरदार टिकेवर भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे. यात उत्तर-दक्षिण असा वादाचा मुद्दाही पुढे आणला जात आहे. पारनेर तालुक्याला खासदार पदाची संधी असल्याने पारनेरकरांनी लाखाच्यावर लीड द्यावे अशी भावनिक साद निलेश लंके यांनी घातली आहे.
दोन्ही उमेदवारांचा पारनेरवर अधिकचा फोकस!!
या दरम्यान सुजय विखे यांनी नेमके पारनेर तालुक्यावरच लक्ष केंद्रित केले असून त्यासाठी आतापर्यंत त्यांच्या सर्वाधिक गाठीभेटी पारनेर तालुक्याच्या गावकुसात सुरू ठेवल्या आहेत. थेट पनवेल गाठून कामोठ्यात एक जंगी कार्यक्रम सुजय विखेंनी घेत लंके वर्तुळात धडकी भरवली आहे. लंके यांच्यावरील नाराज जुने सहकारी आपलेसे केले आहेत. जेष्ठ शिवसेना नेते माजी आ.विजय औटी यांची भूमिका महत्त्वाची असल्याने राधाकृष्ण विखे यांनी त्यांची तसेच जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन धमाका उडवून दिल्याचे बोलले जाते. सुजित झावरे यांनीही सुजय विखे यांना काम करण्याचे आश्वासन दिल्याने विखेंची यंत्रणा सर्वाधिक लक्ष पारनेर तालुक्यात देत असल्याचे चित्र आहे. मात्र हे सर्व होत असताना विखे पिता-पुत्रांनी याचा जास्त गाजावाजा न करता काम सुरू ठेवल्याचे दिसून येत आहे.
व्हायरल ऑडिओ-व्हिडीओ क्लिप्सने उडवला धुराळा!!
-सध्या व्हायरल ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप्सचा धुराळा दोन्ही बाजूंनी सुरू आहे. यासाठी दोन्ही बाजूंचे आयटी सेल चांगलेच कामाला लागले असून एकमेकांवर बारीक लक्ष ठेवून आहेत. व्हायरल क्लिप्स नंतर त्यावर प्रतिउत्तर म्हणून नव्याने क्लिप्स व्हायरल होत असल्याने एकीकडे नागरिकांचे मनोरंजन होत आहे तर दुसरीकडे स्थानिक कार्यकर्त्यांत सोशल वॉर सुरू झाल्याने काहीसे तणावाचे वातावरण असू शकते. खुलासे-प्रतिखुलासे सुरू आहेत. माध्यमांनी आता असल्या व्हायरल आणि कायदेशीर अडचणी निर्माण करणाऱ्या व्हायरल क्लिप्स पासून सावध राहून प्रसिद्धी देताना विचार सुरू केला आहे. आता या आठवड्यात उमेदवारी भरण्यास सुरुवात होणार असल्याने प्रचाराची खरी रंगत त्यानंतर सुरू होणार आहे. अर्थात निवडणूक आयोग आता अधिक सक्रिय होणार असल्याने आदर्श आचारसंहिता पालनाची जबाबदारी दोन्ही बाजूंची असणार आहे.
खासदार माझा भला..!!
आता मतदार सुजय विखे यांना पुन्हा संधी देणार की निलेश लंके यांना खासदार म्हणून अजमावणार याची उत्सुकता निश्चित असणार आहे. खासदार म्हणून सुजय विखेंनी पाच वर्षात केलेली कामे जनतेच्या नजरेसमोर आहेत तर निलेश लंके यांच्या धडाकेबाज कामाची पद्धत मतदार ओळखून आहे. अर्थात विधानसभेत काम करणे आणि लोकसभेत लोकप्रतिनिधींत्व करणे यात मोठा फरक आहे. त्यामुळे मतदारांना आपला पुढील खासदार निवडताना मोठा चोखंदळपणा दाखवणे गरजेचे आहे. प्रचाराच्या निमित्ताने उडणारा धुराळा मोठा असतो, या धुराळ्यात आपला खासदार नेमका कोण योग्य राहिला याची निवड करताना मतदारराजाची मोठी परीक्षा असणार आहे. केंद्र सरकार कडून मिळणारा निधी हजारो कोटींचा असतो, या नधीतून मोजकी पण शाश्वत मोठी कामे होत असतात. युवांना रोजगार आणि शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव हे दोन मुद्दे केंद्रीय पातळीवर महत्वाचे आहेत. त्यामुळे मतदारसंघात मोठे उद्योग येणे आणि स्थानिकांना तिथे प्राधान्याने रोजगार मिळवून देण्यासाठी तसेच केंद्रीय पातळीवर शेतकऱ्यांच्या समस्या लावून धरत शेतमालाला शेतकरी पूरक धोरणाला प्राधान्य देणारा लोकप्रतिनिधी लोकसभेत हवा असतो. सर्व गटातील नागरिकांसाठी असणाऱ्या योजना जिल्ह्यात आणून त्या नागरिकांपर्यंत पोहचवणारा लोकप्रतिनिधी संसदेत असेल तर त्याचा मोठा फायदा होतो. सर्व तालुक्यांना समान न्याय देत विकासाचा समतोल झाल्यास जिल्ह्याची ओळख वाढणार आहे. रेल्वेचे विस्तारीकरण अत्यावश्यक असून यातून स्थानिक शेतमाल, उद्योग कच्चा-पक्या मालाचे दळणवळण फायदेशीर ठरते. विमानतळ झाल्यास मोठे उद्योगपती आकर्षित होतानाच नागरिकांना वेळेची बचत करणारी दळणवळणाची सोय काळाची गरज आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आल्यास सामान्य कुटुंबातील हुशार मुलांना उच्चशिक्षणाची संधी असणार आहेत.. अशा अनेक केंद्रीय पातळीवरून होणारी कामे अभ्यासपूर्ण पणे मांडून ती पदरात पाडून घेणारा लोकप्रतिनिधीची गरज मतदारांनी ओळखली पाहिजे. या मुद्यांवर काम करण्याबाबत अश्वस्थ करणारा आणि भरवोशाच्या उमेदवार लोकसभे साठी निवडून देण्याची जबाबदारी आता मतदारांची असणार आहे.