नगर:
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आता कधीही लागू शकते या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या एका आठवड्यात दुसऱ्यांदा झालेल्या बैठकीत आज अनेक निर्णय घेण्यात आले. यात विशेष करून मतदारांच्या भावनांना हात घालत आकर्षित करणारे अनेक निर्णय घेण्यात आल्याचे दिसून येत आहे.
यात मुख्यत्वे अनेक नावांचे नामांतर करण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे. यात मुंबईमधील अनेक रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यात आली असून त्याचबरोबर अहमदनगर शहराचे नामांतर करत “पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर” असे करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात करण्यात आला आहे.
याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराचे अहमदनगर शहराचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे असे सांगत पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्य कर्तृत्वाचा गौरव करणारा, त्यांचे विचार आणि कार्य तसेच त्यांची स्मृती पुढे घेऊन जाणारा आणि लोकप्रतिनिधींना चांगली कार्य करण्याची प्रेरणा देणारा असा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली. या निर्णयाने अहमदनगर शहरवासियांची तसेच जिल्ह्यातील नागरिक यांची आणि महाराष्ट्रातील 13 कोटी नागरिकांची इच्छा पूर्ण झाली असल्याचे पवार म्हणाले. हा निर्णय होण्यासाठी आमदार संग्राम जगताप, दत्ता भरणे, अशितोष काळे, नितीन पवार आदी लोकप्रतिनिधींनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्या सर्वांचे तसेच महाराष्ट्र वासियांचे मी मनापासून अभिनंदन करतो अशा शब्दात अजित पवार यांनी आपली भावना व्यक्त केली.