नेवासा : अॅड. रियाज पठाण खून खटला:
७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप, पाच आरोपींची निर्दोष मुक्तता..
अॅड. उज्ज्वल निकम यांनी मांडली होती बाजू
अहिल्यानगर: नेवासे तहसील कार्यालयात आलेले अॅड. रियाज पठाण यांची 2013 साली गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकणी अहिल्यानगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात खटला सुरू होता. याबाबत शुक्रवारी जिल्हा सत्र न्यायाधीश एस बी कचरे यांनी निकाल सुनावत एकूण 12 आरोपींपैकी सात आरोपींना दोषी पकडत आजन्म जन्मठेप(कारावास) सुनावला तर पाच जणांची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपींनी एका खटल्यात आरोपींविरोधात जबाब दिल्याच्या संशयावरून ही हत्या झाल्याचा आरोप होता. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी बाजू मांडली.
नेवासा येथील अॅड. रियाज पठाण हे दिनांक १६/०९/२०१३ रोजी नेवासा तहसील कार्यालयात एका दस्तऐवजाच्या नोंदणीकरिता त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत गेले असताना, त्यांच्यावरती पाळत ठेवून जवळजवळ १२ आरोपींनी कट रचला होता. एका आरोपीने त्यांच्यावरती पिस्तुलातून पाठीमागून तीन गोळ्या झाडल्या होत्या. त्यामुळे त्या क्षणी त्यांना ताबडतोब रियाज पठाण यांच्या सहकाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये हलवलं. नेवासा हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना अहिल्यानगर येथील सिव्हिल हॉस्पिटल आणि नंतर एका खाजगी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. जेथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
या खटल्याचं वैशिष्ट्य असं की, यात जो प्रमुख आरोपी प्रवीण पोपट खरचंद – ज्याने रियाज पठाण यांच्यावरती पाठीमागून तीन गोळ्या झाडल्या, त्याने ‘मी अज्ञान (नाबालिग) आहे, माझ्याविरुद्ध हा खटला चालू शकत नाही’ अशा रीतीचा बचावाचा पवित्रा घेतला होता. अर्थात, सरकारी पक्षातर्फे तो पवित्रा खोडून काढला आणि न्यायालयाने देखील तो ‘मेजर’ (सज्ञान) आहे असा निर्णय दिला होता. अशी बाजू विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी मांडली होती. या खटल्यामध्ये आरोपी सोपान गाढे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा कट रचला होता, असा सरकारी पक्षाचा आरोप होता. न्यायालयात स्पष्ट सांगितलं की एकूण ७ जणांच्या विरुद्ध प्रत्यक्ष पुरावा आहे, बाकीच्यांच्या विरुद्ध कटाचा प्रत्यक्ष पुरावा नाही. त्यामुळे न्यायालयाने उर्वरित आरोपींना निर्दोष सोडलं आहे; परंतु ७ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा आज न्यायालयाने ठोठावली आहे.
जन्मठेपेची शिक्षा झालेले ७ आरोपीया प्रमाणे: प्रवीण पोपट खरचंद (मुख्य आरोपी), मोहन लष्करे, रामेश्वर गाढे, चौरंगीनाथ लष्करे, पवन नरुल्ला, सचिन चव्हाण आणि सादिक शेख.
निर्दोष मुक्तता झालेले ५ आरोपी: अशोक जगताप, सत्यवान सोनकांबळे, विलास जिरे, सोपान गाढे आणि सुनील उर्फ सोन्या परदेशी

